भारतीय वैदिक संस्कृती म्हणजे सर्वांत प्रगत असे माहिती साठवण्याचे तंत्रज्ञान

अहिल्यानगरचे १९ वर्षांचे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी पूर्ण केलेल्या दंडक्रम पारायणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास पोस्ट लिहून त्यांचे कौतुक केले. काशी तमीळ संगमम् कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला. खुद्द पंतप्रधानांनी कौतुक केल्यामुळे वेदमूर्ती रेखे यांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली. शनाका अ‍ॅन्स्लेम पेरेरा या श्रीलंकेतील लेखकाने या निमित्ताने भारतीय संस्कृतीबद्दलचे विचार मांडणारा एक लेख सोशल मीडियावर लिहिला आहे. त्याचा भावानुवाद येथे देत आहोत.
…..
मानवी संस्कृतीने एक संदेश दिला आहे…

एआयमुळे मानवजात संपुष्टात येईल का, यावर सिलिकॉन व्हॅलीमध्ये चर्चा सुरू असताना, वाराणसीत १९ वर्षांच्या एका तरुणाने असे काही सिद्ध केले आहे, ज्याचे कधीच ऑटोमेशन (स्वयंचलित) होऊ शकत नाही.

वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी शुक्ल यजुर्वेदातील माध्यंदिन शाखेचे दंडक्रम पारायण पूर्ण केले. तब्बल दोन हजार मंत्र ५० दिवस अखंडितपणे निर्दोष रीतीने उच्चारून त्यांनी हे यश साध्य केले.

गेल्या २०० वर्षांत हे साध्य करणारा पहिला मनुष्य.

हे डाउनलोड केलेले नव्हते. याचा कोणता प्रॉम्प्ट नव्हता. पिढ्यान्‌पिढ्या जतन झालेल्या पाच हजार वर्षांच्या अखंड स्मरणपरंपरेतून, गुरूच्या तोंडून शिष्याच्या कानातून त्याच्या मेंदूत उतरलेले ज्ञान… या काळात साम्राज्ये उभी राहिली, कोसळली, नाहीशी झाली… तरीही ही परंपरा अबाधित राहिली.

आणि १.४ अब्ज लोकसंख्येच्या देशाच्या नेत्याने (पंतप्रधान नरेंद्र मोदी) स्वतः त्यांचा गौरव केला. तो अब्जाधीश नव्हता. एन्फ्लुएन्सरही नव्हता. तो होता एक तरुण… आपल्या पूर्वजांनी जे साध्य केले, तसेच, त्याच पवित्र नगरीत, त्याच पद्धतीने, त्याच निष्ठेने साध्य करणारा एक तरुण…

आधुनिक जग ज्याचे गणित मांडू शकत नाही, ती ही गोष्ट आहे…

कुठलाही अल्गोरिदम याची पुनरावृत्ती करू शकत नाही. कुठलाही सर्व्हर हे साठवू शकत नाही. वीजपुरवठा खंडित झाला, डेटा सेंटर्स अयशस्वी ठरली, तरीही ही परंपरा त्या पवित्र नगरीत, गुरू–शिष्यांच्या परंपरेतून पुढे जातच राहील, जिथे ती लाखो वर्षांपासून राहिली आहे…

पाश्चिमात्य जग एखाद्या गोष्टीचं स्मरण ठेवण्यासाठी स्मारके उभारते.

भारत अशी माणसे घडवतो, जी स्वतःच जणू जिवंत स्मारके असतात.

ज्या नागरी संस्कृतींनी आपल्या ज्ञानपरंपरा, ज्ञानसाखळ्या जपल्या नाहीत, त्या संस्कृती आता फक्त पुरातत्त्व स्वरूपात राहिल्या आहेत. ज्या नागरी संस्कृतींनी त्या जपल्या, त्या आजही जिवंत आहेत, चालत्या-बोलत्या आहेत.

हे स्मरणरंजन (नॉस्टॅल्जिया) नाही. हा धर्मही नाही. हे माणसाने निर्माण केलेले सर्वांत प्रगत असे माहिती साठवण्याचे तंत्रज्ञान आहे – जिवंत आवाज, प्रशिक्षित मन आणि हजारो वर्षे अखंड राहिलेली परंपरा – साखळी

साम्राज्ये कोलमडतात… परंपरा नाही…

१९ वर्षांच्या एका तरुणाने हे पुन्हा सिद्ध केले आहे.

द असेंट बिगिन्स.

Shanaka Anslem Perera यांची मूळ एक्स पोस्ट वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *