मनोहर पर्रीकर

साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा… ‘कॉमन मॅन’चे मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचे सामान्य कार्यकर्ते, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षणमंत्री असा पर्रीकर यांचा प्रवास थक्क करणारा होता; मात्र यशाची अनेक शिखरे गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला. १३ डिसेंबर हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने हे छोटे टिपण…

मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्यात म्हापसा येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण लोयोला हायस्कूलमध्ये झाले. १९७८मध्ये त्यांनी ‘आयआयटी मुंबई’तून इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. राजकारणात येण्याआधी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे ओढले गेले. आरएसएसच्या उत्तर गोवा युनिटमध्ये ते सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ राजकारणात पाऊल ठेवले आणि कधीही मागे वळून पाहिले नाही. २००० साली पर्रीकर गोव्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. सामान्य गोवेकरांचा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा होती. ते स्कूटरवरून मुख्यमंत्री कार्यालयात जायचे. मुख्यमंत्री झाल्यानंतरही पर्रीकर पणजीतील शासकीय निवासस्थानी न राहता म्हापसा येथील वडिलोपार्जित घरातच राहायचे. विशेष म्हणजे देशातील पहिले आयआयटी पदवीधर मुख्यमंत्री हा बहुमान पर्रीकर यांना मिळाला.
२०१२ च्या निवडणुकीनंतर राज्यात पेट्रोलवरील व्हॅट हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय पर्रीकर यांनी घेतला. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात ११ रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळू लागले. पर्रीकर यांच्या या निर्णयाची देशभरात चर्चा झाली. दयानंद सामाजिक सुरक्षा योजना, सायबर एज योजना, सीएम रोजगार योजना या माध्यमातून पर्रीकर यांनी गोवेकरांच्या मनावर राज्य केले. त्यामुळेच गोव्याला सलग तीन वर्षे ‘बेस्ट गव्हर्निंग स्टेट’ हा बहुमान मिळाला. नोव्हेंबर २०१४मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्रीकर यांना गोव्यातून दिल्लीत पाचारण केले आणि त्यांच्या हाती देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. पर्रीकर यांच्याच कार्यकाळात उरी हल्ल्याचा बदला म्हणून सप्टेंबर २०१६मध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देऊन भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राइक घडवला. मार्च २०१७मध्ये पर्रीकर यांनी संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. फेब्रुवारी २०१८मध्ये पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि या आजाराशी चाललेली त्यांची झुंज त्यांच्या मृत्यूनंतरच थांबली. १७ मार्च २०१९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशा या असामान्य नेत्याला शतश: प्रणाम!
(संकलित माहिती)

🔗

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *