अमरावती : मेळघाटाच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या कोट या दुर्गम गावाला आता विकासाची चाहूल लागली आहे. कारण उद्योजक घडवणाऱ्या ‘अमृत’ संस्थेचे पाऊल या गावात पडले आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी ११ डिसेंबर २०२५ रोजी अमरावती जिल्ह्याच्या धारणी तालुक्यात वसलेल्या कोट या गावाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, त्यांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन दिले.
या वेळी विजय जोशी यांच्यासोबत अमृत संस्थेचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, अमरावती विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, अमरावती जिल्हा व्यवस्थापक केदार गोगरकर, जिल्हा उपव्यवस्थापक हृषीकेश कथलकर हे अधिकारी उपस्थित होते. अमरावती विभागातील टीमने याआधीही वेळोवेळी या गावाला भेट दिली असून, गावात विकास घडवून आणण्याचे उद्दिष्ट त्यामागे आहे.
विजय जोशी यांनी कोट गावातील राजपूत समाजातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांना उद्योग आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी आवाहन केले. शेतीसंदर्भातील योजना, त्यातून उभे राहू शकतील असे उद्योग यांची माहिती त्यांनी दिली. गावकऱ्यांनी काही समस्या जोशी यांच्यासमोर मांडल्या. तसेच, रोजगाराच्या अपेक्षा व्यक्त केल्या. त्यावर विजय जोशी या सरांनी उद्योजक होण्याचे आणि त्यासाठी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभा घेण्याचे आवाहन त्यांना केले.
हा केवळ एक शासकीय दौरा नव्हता, तर या दौऱ्यातून विजय जोशी यांच्यासह अमृत संस्थेच्या टीमने संवेदनशीलपणे गावकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. त्यांच्या संघर्षांच्या कहाण्या ऐकल्या. गावातील कमतरतांसह समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न अमृत संस्था काही काळापासून करत असून, गावकऱ्यांना मार्गदर्शनासह विविध प्रकारच्या सहकार्याचा हात पुढे केला आहे. कोट हे उद्योगांचे गाव म्हणून उभे करून गावातील तरुणांना गावातच रोजगार मिळण्याच्या दृष्टीने तरुणांना आवश्यक प्रशिक्षणासह अन्य बाबी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अमृत संस्था प्रयत्नशील आहे.



अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/mahaamrut_official/profilecard/?igsh=MW04OHNnamxweXZlbA==
फेसबुक : https://www.facebook.com/share/1CGYUSjznh/?mibextid=qi2Omg
